भारताचा धावांचा डोंगर : न्यूझीलंडला ३९८ धावांचे आव्हान

मुंबई-वृत्तसेवा | येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या न्यूझीलंड विरूध्दच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात किंग कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शतकांच्या बळावर भारताने धावांचे डोंगर उभारत किवींना ३९८ धावांचे आव्हान दिले आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये विश्‍वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला जात आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करतांना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला जोरदार सुरूवात करून दिली. रोहित बाद झाल्यानंतर शुभमनने फटकेबाजी केली. मात्र तो रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर विराट आणि श्रेयसने सूत्रे हाती घेतली.

विराट कोहलीने प्रारंभी शुभमनला साथ दिली. यानंतर मात्र त्याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने आज सचिनचा २००३च्या विश्‍वचषकातील सर्वाधीत ६७३ धावांचा विक्रम मोडीत काढला. यासोबत त्याने सचिनच्या एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांचा रॅकॉर्ड मोडत पन्नासावे शतक झळकावले आहे. ११३ चेंडूंमध्ये तब्बल ११७ धावा फटकावत तो बाद झाला. मात्र याआधी त्याने भारताला सुस्थितीत पोहचवले.

यानंतर श्रेयस अय्यरने जोरदार फटकेबाजी करत आपले शतक पूर्ण केले. त्याने १०५ धावा केल्या. तर के. एल. राहूलने त्याला समर्थ साथ दिली. भारताने चार बाद ३९७ धावा केल्या असून आता न्यूझीलंडला विजय मिळवायचा असल्यास त्यांना ३९८ धावा कराव्या लागणार आहेत.

Protected Content