जळगाव (प्रतिनिधी) ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेतंर्गत जिल्ह्यात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ठिकठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. जिल्ह्यातही तीन दिवसात 76 हजार 684 वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेत आतापर्यंत 3285 नागरीकांनी सहभाग लाभला असल्याची माहिती जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली आहे.
या मोहिमेतंर्गत जिल्ह्यात वन विभागामार्फत 31 हजार 561, सामाजिक वनीकरण विभागामार्फत 41 हजार 582, कृषि विभाग 300, नगरविकास विभाग 550, वीज वितरण 265, महसुल विभाग 995, ग्रामपंचायत 265, शिक्षण विभाग 246, तंत्र शिक्षण विभाग 100, पोलीस विभाग 817 याप्रमाणे एकूण 76 हजार 684 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आता ग्रामपंचायत पातळीवर वृक्ष लागवड मोहिम व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असून ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत नागरीकांचा सहभाग मिळवून या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरुप देण्यात येणार आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्याला 1 कोटी 15 लाख 3 हजार 100 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात 8 हजार 390 जागांवर 1 कोटी 12 लाख 65 हजार 477 वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 1 कोटी 10 लाख 13 हजार 399 खड्डे खोदून पूर्ण करण्यात आले आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नागरीकांनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदवावा व प्रत्येक नागरीकाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा. असे आवाहन उप वनसंरक्षक श्री. पगार यांनी केले आहे.