मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकर्यांना प्रति युनिट एक रूपया सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील वीज ग्राहकांना प्रिपेड मीटर देखील आता घेता येणार आहेत.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रीमंडळाची बैठक झाली. यातील निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना ५० हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकर्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट एक रुपयांची सवलत देण्यात आली आहे. यासोबत, राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारवून ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गणपती आणि दहीहंडी उत्सवामध्ये ज्या कार्यकर्त्यावर केसेस झाल्या होत्या. त्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना काळात ज्यांच्यावर केस झाल्या, त्या देखील मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.