जळगाव (प्रतिनिधी) निसर्गाने आपणास खूप चांगले आयुष्य व आरोग्य दिले असून त्याचा पुरेपूर फायदा घेऊन जीवनात नेहमी आनंदी राहून ज्या-ज्या ठिकाणाहून ज्ञान मिळेल तेथून ते घेत रहावे, यासाठी वयाची मर्यादा नसेल तेव्हाच आपण यशस्वी होऊ, असे भावनिक आव्हान प्रभारी पोलीस निरीक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे विलास सोनवणे यांनी केले. ते एच आय व्ही सह जगणारे पालक व मुलांसमोर कांताई सभागृहात बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर फारूक शेख,करीम सालार,सुधीर वाघूळदे,अरविंद देशपांडे,मोहरील विजय,रवींद्र धर्माधिकारी,मनीषा बागुल,आशा चौधरी,पूनम पाटील व संगीता पाटील उपस्थित होते. भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दर महिन्याच्या २५ तारखेला एचआयव्ही बाधित मुलं, मुली व पालकांना सकस आहार दिला जातो. तसेच त्यांच्या सोबत जेवण घेऊन त्यांच्याशी हितगुंज केली जाते. आज श्री.सोनवणे यांनी खास एचआयव्ही बाधितांना प्रेरणा देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा,अनुभवाचा व अभ्यासाचा उपयोग करून त्यांना आपल्या मधील बदल घडवण्यासाठी प्रेरित केले. तसेच जगात आशा दिव्यांग व्यक्तींची सचित्र माहिती दिली. ज्यांना हात नाही पाय नाही, तरी ते जगातील यशस्वी लोकांमध्ये आहे. तर ईश्वराने आपणास सर्व काही दिले असून आपण निराश होता कामा नये, असा संदेश दिला. यावेळी करीम सालार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. सर्व एचआयव्ही बधितांना सकस आहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार फारूक शेख यांनी केले.