मुंबईत वीज गायब

मुंबई: वृत्तसंस्था । दक्षिण मुंबईसह पूर्व, पश्चिम उपनगरांत वीज पुरवठा खंडीत झाल्यानं मुंबईत वीज गायब झाली आहे. ‘बेस्ट’ला वीजपुरवठा करणाऱ्या ‘टाटा पॉवर’च्या वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने यंत्रणा ‘ट्रिप’ झाली वीजपुरवठा खंडित झाल्याचे ‘बेस्ट’च्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापारेषणच्या कळवा पडघा केंद्रात सर्किट देखभाल-दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भागात फटका बसला आहे. कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. डहाणूकडून येणाऱ्या विद्युत वाहिन्यांना याचा फटका बसला आहे.

वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. सध्या उरणमधील २२० केव्ही ची वहिनी पूर्ववत होतेय तर, पश्चिम क्षेत्र भार नियमन व राज्य भार नियमन केंद्राकडून जोमाने प्रयत्न सुरू आहेत, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं लोकल सेवेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेही ठप्प आहे. लोकल एकाच जागी थांबली आहे असून लोकलमध्ये प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा लोकल सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

अंतिम वर्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. ऑनलाइन लेक्चर्स सुरू असताना अचानक वीज गेल्यानं गोंधळ उडाला अनेक शाळांच्या परीक्षा सुरू होत्या वीज पुरवठा खंडित झाल्यानं ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीयेत.

Protected Content