सीडनी वृत्तसंस्था । ऑस्ट्रेलियात सुरू असणार्या महिला टि-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाल्याने भारतीय चमू अंतिम फेरीत पोहचला आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. टी २० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारताने प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली असून आता विजेतेपदाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो? याकडे सार्यांचे लक्ष लागले होते. पण अखेर पावसामुळे सामना रद्द झाल्याने इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा दुसरा सामना रंगणार आहे. यातील विजेत्यासोबत भारतीय संघाची अंतिम फेरीत टक्कर होणार आहे.