ब्रेकींग : जळगाव जिल्ह्यातील निर्बंध उठविले; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | कोरोनाचा संसर्ग कमी असणार्‍या राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बर्ंध उठविण्यात येत असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली असून यात जळगावचा समावेश आहे. यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंध उठणार असून स्थानिक पातळीवर याबाबत लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.

राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. आज टास्क फोर्सची बैठक पार पडल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना याबाबतची माहिती दिली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अजूनही निर्बंध कायम राहणार आहेत. यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि नगर या जिल्ह्याचा समावेश असल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध उठविण्याबाबत घोषणा केली असली तरी स्थानिक प्रशासन स्वतंत्र नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची स्थानिक पातळीवर घोषणा करणार आहे. यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या घोषणेपर्यंत जिल्ह्यात निर्बंध लागू राहतील हे स्पष्ट आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यात शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल. थिएटर्स, व्यायामशाळा यांना काही प्रमाणात निर्बंधांमधून सूट मिळू शकते. त्यासोबतच, एसी हॉलमध्ये गर्दी होऊ नये, लग्नात, राजकीय कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचा जीआर मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर काढला जाईल, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं.

Protected Content