मुंबई-वृत्तसेवा । मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीदरम्यान एका महिलेने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना सुनावल्याची घटना चर्चेत आली आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर, विशेषतः भाजपवर जोरदार टीका केली असताना, आता मंत्री महाजन यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाजन म्हणाले की, महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर हा मोर्चा काढण्यात आला होता आणि मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. “मोर्चादरम्यान काही वेळ वाहतूक कोंडी झाली, हे खरे आहे. मात्र संबंधित महिला अत्यंत संतप्त अवस्थेत होत्या आणि त्यांनी अयोग्य भाषेत प्रतिक्रिया दिली,” असे त्यांनी सांगितले.

महाजन यांनी सांगितले की, त्या महिलेला पोलिसांकडे तक्रार करण्याचा पर्याय होता. “त्या ठिकाणी पोलिस उपस्थित होते. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या,” असेही ते म्हणाले.
महाजन यांच्या मते, संबंधित महिलेने संतापाच्या भरात मोर्चावर पाण्याची बाटली फेकली. “मी त्यांना समजावले की काही वेळात रस्ता मोकळा करू, पण त्यांनी ऐकले नाही. अखेर काही वेळाने त्या तेथून निघून गेल्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चाच्या नियोजनाबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “पोलिसांची परवानगी घेऊनच मोर्चा काढण्यात आला होता. वेळही सायंकाळची होती. नियोजनात त्रुटी नव्हती, तरीही अशा घटना टाळण्यासाठी पुढील वेळी अधिक काळजी घेऊ.”
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे मोर्चांचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास या मुद्द्यांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.



