जळगावच्या भाविकांवर काळाचा घाला : दोन ठार; आठ जण जखमी

रावेर प्रतिनिधी | मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाचे दर्शन घेऊन परतणार्‍या जळगाव येथील भाविकांच्या मालवाहू वाहनाला झालेल्या अपघातात जळगाव शहरातील दोन भाविक ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत.

याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजला पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील कांचननगर भागातील काही जण एमएच१९ सीवाय-५३१५ या क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने मध्यप्रदेशातील शिरवेल येथील महादेवाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून रात्री परत येत असतांना पाल जवळ सुमारे अकराच्या सुमारास त्यांच्या वाहनानी झाडाला धडक दिली. यानंतर हे वाहन पलटी झाले.

या अपघातात प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६, रा. कांचननगर जळगाव) आणि गोलू बंडू परदेशी (वय २६, रा कांचननगर) हे दोन्ही जण जागीच मृत झाले. तर तर अजय सुनिल वाल्हे (वय २१), गणेश रविंद्र सोनवणे (वय २३), परेश निंबा सोनवणे (वय २६), चेतन रविंद्र मोरे (वय २३), पवन रविंद्र मोरे (वय २२), महेश गोविंदा सोनवणे ( वय २१), गजानन रमेश पाटील (वय २४) व चालक विक्की अरूण चौधरी (वय २५) हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

Protected Content