राम मंदिराच्या भूमिपुजनाची ही वेळ नाही- राज ठाकरे

मुंबई वृत्तसंस्था । राम मंदिराचं भूमिपूजन ही अभिमानास्पद बाब असली तरी सध्या यासाठी योग्य वेळ नसल्याचे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केले आहे.

एबीपी-माझा या वृत्तवाहिनीच्या माझा महाराष्ट्र-माझं व्हिजन या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी ५ ऑगस्ट रोजी होणार्‍या राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर भाष्य केले. ते म्हणाले की, राम मंदिर निश्‍चित झालं पाहिजे. ही माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी असंख्य कारसेवकांनी प्राणांची आहुती दिली. राम मंदिराचं भूमिपूजन असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे राम मंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं, पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. लोक वेगळ्या विवंचनेत आहेत. भूमिपूजन आहे, एक दिवसाची बातमी होती. पण लोक त्या मानसिकतेत नाही. झालं तर आनंद आहे, ते मंदिर उभं राहिल तेव्हा जास्त आनंद होईल. पण आताच्या वेळी हे भूमिपूजन का ठेवलं हा प्रश्‍न आहे. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर झालं तरी चालेल. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे ई-भूमिपूजन नको, त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.

Protected Content