जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक आणि यांत्रिक पद्धतीने M-Sand (कृत्रिम वाळू) उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने इच्छुक उद्योजक, संस्था आणि कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. महसूल व वन विभागाने २३ मे २०२५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार हे आवाहन करण्यात आले असून, यामुळे जिल्ह्यात वाळूची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती दिली. या प्रकल्पांसाठी सादर करण्यात येणाऱ्या प्रस्तावांमध्ये प्रकल्पाचे संपूर्ण स्वरूप, उद्दिष्ट, जागेचे वितरण आणि भू-संपत्तीविषयक कागदपत्रे यांचा समावेश असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, पर्यावरणीय परवाने आणि इतर संबंधित यंत्रणांकडून घेतलेली अनुमती, वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीची माहिती, वार्षिक उत्पादन क्षमतेचे सविस्तर विवरण, तसेच आर्थिक व तांत्रिक पात्रता दर्शवणारी कागदपत्रे आणि संबंधित अनुभव असल्यास त्याचा तपशीलही प्रस्तावासोबत जोडणे बंधनकारक आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शासन निर्णयातील अटी आणि मार्गदर्शक तत्त्वे या प्रक्रियेसाठी लागू राहतील. अपूर्ण प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. प्रस्तावांची अंतिम छाननी करून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे राहील.
इच्छुक उद्योजक किंवा संस्थांनी आपले प्रस्ताव आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या पुढाकारामुळे जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला आवश्यक असलेल्या वाळूची पर्यायी व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.