जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गुरु रविदास क्लबच्या वतीने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (दि. 12 जुलै) केमिस्ट भवन, जिल्हा पेठ येथे उत्साहात पार पडला. दहावी, बारावी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या एकूण 98 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजूमामा भोळे, नगरसेविका सौ. सुरेखा नितीन तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी यशवंतराव ठोसरे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजूमामा भोळे यांनी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाच्या विकासात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले. तर प्रमुख वक्ते माजी प्राचार्य निळकंठराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयाची निश्चित दिशा ठरवून जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत अनेक प्रेरणादायी अनुभवही सांगितले.

सेवानिवृत्त मुख्य अभियंता डॉ. राजेंद्र बाविस्कर यांनी समाजातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्रशासनातील उच्च पदे भूषवावीत तसेच उद्योग-व्यवसाय क्षेत्रातही प्रगती साधावी, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, सचिव प्रदीप शेकोकार, डॉ. संदीप भारुळे, सौ. ज्योती निंभोरे, प्रा. स्मिता जयकर, प्रा. विठ्ठलराव सावकारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश सूर्यवंशी व गजानन दांडगे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांची यादी प्रा. संजय सूर्यवंशी, संजय निंभोरे व प्रतिभा बाविस्कर यांनी वाचून दाखविली. आभार प्रदर्शन प्रदीप शेकोकार यांनी केले. लोकवर्गणीतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरु रविदास क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच त्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि समाजसेवेची प्रेरणा देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.



