मुक्ताईनगर प्रतिनिधी | भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता ईडीचा विषय संपला असल्याचे सांगत आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि आ. गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते असणारे नाथाभाऊ आणि आ. गिरीश महाजन यांच्यात आता जाहीर वाद पेटला आहे. खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी बोदवड येथे बोलतांना आ. गिरीश महाजन आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. याला आ. चंद्रकांत पाटील यांनी लागलीच, तर आ. गिरीश महाजन यांनी शनिवारी जोरदार उत्तर दिले होते. यानंतर एकनाथराव खडसे यांनी टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना पुन्हा एकदा महाजनांसह भाजप आणि भाजप नेत्यांना लक्ष केले आहे.
एकनाथराव खडसे म्हणाले की, माझ्या मुलीच्या पराभवामागे महाजनच असल्याचं मला कालच समजले. यामुळे मी भाजपमध्ये असलेल्यांना सांगतो की, अरे भाजपवाल्यांनी माझे असे हाल केले. तुम्ही काय त्यांची हाजीहाजी करता. राष्ट्रवादीत या, असं आवाहन खडसे यांनी भाजपमधील नेत्यांना केलं. तसेच आपण गिरीश महाजन यांना आवाहन करतो की, मी कमवलेली प्रॉपर्टी जर बेहिशोबी असेल तर तुम्हाला मी दान करून टाकेल. या उलट बीएचआर घोटाळ्यातून तुम्ही १० कोटींची जमीन खरेदी केली आहे. माझ्याकडे उतारे आहेत, असा दावा खडसे यांनी केला.
या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांनी ईडीबाबतची भाष्य केले. ते म्हणाले की, मी तुमचा बीएचआर घोटाळा बाहेर काढला. त्यामुळेच यांचा जीव धकधक करत आहे. ईडीचा विषय आता संपला आहे. कोर्टात माझ्याविषयीची चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे मी ईडीला घाबरत नाही. मी फक्त कोर्टाला घाबरतो, असं ते म्हणाले. यावेळी खडसे यांनी राष्ट्रवादीत आल्यानंतरच मला भाजपमधील नीच आणि गद्दार कोण हे समजलं आहे. मी चाळीस वर्ष जीवाची पर्वा न करता भाजपमध्ये काम केलं. त्याच गद्दारांनी माझ्यावर अन्याय केला. हे गद्दार कोण आहेत हे एकदा गुगलवर सर्च करून पाहा. टरबूज असं सर्च करून पाहा, मग कळेल गद्दार कोण?, अशी टीका त्यांनी केली.