नगरदेवळा येथे वहीगायन लोककलावंतांचा मेळावा उत्साहात

 

 

पाचोरा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यात व खान्देशातही अनेक लोककला लोकप्रिय असल्या तरी केवळ खान्देशातच साजरा होणाऱ्या कानुबाई उत्सवाच्या वेळेस खास करून गायला जाणाऱ्या वहिगायन या लोककलेच्या कलावंतांचा तालुक्यातील नगरदेवळा येथे लोककलावंत विकास परिषद, जळगाव व साई शक्ती वही मंडळ, नगरदेवळा आयोजित खांदेशातील वहिगायन लोककलावंतांचा विभागीय १५ वा मेळावा दि. २८ नोव्हेंबर रोजी शेकडो लोककलावंतांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, नगरदेवळा येथील महिला सरपंच प्रतिक्षा काटकर, स्वागताध्यक्ष लोकशाहीर शिवाजीराव पाटील व प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष विनोद ढगे हे उपस्थित होते. यावेळी नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्य व कलाप्रेमी नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाहीर शिवाजीराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच ज्याप्रमाणे कोकणातील दशावतार या कलेला, विदर्भातील खडीगंमत व दंडार या कलेला, पश्चिम महाराष्ट्रातील लावणी व तमाशा या कलांना,मराठवाड्यातील गोंधळ व शाहिरी या कलांना महाराष्ट्र शासन स्तरावर राजमान्यता मिळाली आहे. त्याप्रमाणे खांदेशचे खास वैशिष्ट्ये असलेल्या वहिगायन या कलाप्रकारास शासन स्तरावर राजमान्यता मिळावी अशी अपेक्षा प्रमुख मार्गदर्शक विनोद ढगे यांनी व्यक्त केली.

यावेळी लोककलावंतांच्या समस्यांना शासन स्तरावर नक्कीच मांडले जाईल व वहिगायन या कलाप्रकारास राजमान्यता मिळवून देऊन पाचोरा येथे तालुक्यातील लोककलावंतांच्या येण्याजाण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून लोककलाभवन निर्मिती साठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन आमदार किशोर पाटील यांनी दिले. तसेच लोककलेच्या राष्ट्रीय निवड समितीवर कार्यरत नगरदेवळा येथील शाहीर शिवाजी पाटील यांचे राहते घर पावसात पडून ते बेघर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात झळकल्या होत्या.

या बातम्यांची दखल घेऊन शाहीर शिवाजी पाटील यांचे घर शासकीय मदतीतून किंवा आमच्या मित्रपरिवाराच्या मदतीतून लवकरच बांधून देऊ असा विश्वास आमदार पाटील यांनी दिला. दिवसभराच्या या कार्यक्रमास उपस्थित वहिगायन मंडळांनी आपापल्या कला सादर केल्या व प्रत्येक मंडळास प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन संजीव बावसकर यांनी केले.

यावेळी रवींद्र पाटील, मनिषा पाटील, अरविंद परदेशी, भैय्यासाहेब महाजन, अविनाश कुढे, वसीम शेख, संतोष महाजन, धनराज चौधरी, उमेश लढे, सुनील महाजन, रोशन जाधव सह पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content