मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच ५ मे २०२५ रोजी जाहीर करणार आहे. मंडळाने आज याबाबत अधिकृत घोषणा केल्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता आणि धाकधूक आता शिगेला पोहोचली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे.
मंडळाने आज निकालासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यावर्षी बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस अगोदर घेण्यात आली होती. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीत राज्यात सुरळीतपणे पार पडली. यंदा राज्यभरातून सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार असून, बोर्डाने निकालाची तयारी पूर्ण केली आहे.
निकाल जाहीर होण्यापूर्वी, उद्या सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संपूर्ण राज्याचा बारावीचा निकाल, तसेच विविध शैक्षणिक विभागांनुसार निकालाची आकडेवारी आणि निकालाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये जाहीर केली जातील. या पत्रकार परिषदेनंतर, ठीक दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी आपला वैयक्तिक निकाल पाहू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या विविध अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल, ज्यामध्ये प्रामुख्याने mahresult.nic.in या वेबसाइटचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्या दुपारी या वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल तपासता येणार आहे.