कर्जमाफीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा एल्गार !

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत हे आश्वासन पूर्ण न झाल्याने महाराष्ट्र शेतकरी संघटनेने राज्यव्यापी बंद पुकारला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली १९ आणि २० एप्रिल रोजी राज्यात दूध आणि भाजीपाला खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदमध्ये भाजीपाला आडत दुकानदार, किरकोळ विक्रेते, दूध डेअरी चालक-मालक आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. बंद यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राज्यभर मोहीम राबवत आहेत. त्यामुळे 19 एप्रिल, शनिवार आणि 20 एप्रिल, रविवार या दोन दिवसांत राज्यात दूध आणि भाजीपाला मिळणार नाही, अशी शक्यता आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना तातडीने ईमेल पाठवून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे. “आम्ही संघटनेच्या माध्यमातून शासनाने कर्जमाफी करावी यासाठी मोहीम राबवत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, दूध डेअरी चालक, भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी 19 आणि 20 एप्रिल रोजी दूध आणि भाजीपाला खरेदी-विक्री करणार नाहीत. हे दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.

महाराष्ट्र शेतकरी संघटनेसह राज्यातील विविध सामाजिक संघटना, भाजीपाला आडत दुकानदार, दूध डेअरी चालक-मालक आणि शेतकरी या बंदला पाठिंबा देत आहेत. 19 आणि 20 एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद पाळला जाईल आणि कोणीही दूध किंवा भाजीपाला खरेदी-विक्री करणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी नेते सुनील देवरे यांनी शासनाने तातडीने कर्जमाफी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या बंदला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content