पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर-शेंदुर्णी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला असलेल्या हिरव्यागार आणि डेरेदार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरू आहे. दिवसाढवळ्या होणारी ही वृक्षतोड निसर्गासाठी घातक ठरत असून, यामुळे परिसरातील तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन अत्यंत आवश्यक असताना, पहूर-शेंदुर्णी रस्त्यावर मात्र याउलट चित्र दिसत आहे. मोठे आणि घनदाट वृक्ष तोडले जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. विकासकामांसाठी रस्ता दुरुस्ती आवश्यक असली तरी, मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड चिंताजनक आहे. निसर्गाचा समतोल बिघडू नये आणि वृक्षांची कत्तल थांबावी, यासाठी संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. वृक्षतोड थांबवून नव्याने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे.
या संदर्भात पहूर येथील लाईव्ह ट्रेंड्स न्यूजचे प्रतिनिधी रवींद्र लाठे यांनी पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षद मुलानी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी मुलानी यांनी सांगितले की, विकासकामांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये आणि रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला आठ मीटरच्या आतील झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.