जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार अचानक राबविण्यात आलेल्या नाकाबंदी आणि कोंबिग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोमवारी २८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत हे विशेष ऑपरेशन राबविण्यात आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर मोठी कारवाई केली आहे. कोंबिग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी दारूबंदीच्या ५६ केसेस दाखल केल्या, तर सट्टा जुगाराच्या २९ प्रकरणांचा पर्दाफाश केला. यासोबतच, अमली पदार्थ विरोधी कारवाईत (एनडीपीएस) १६ जणांना गांजा सेवन करताना ताब्यात घेण्यात आले.
न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) बजावणीत पोलिसांनी मोठी यश मिळवले असून ४१ वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, १९ बेलेबल वॉरंटची देखील बजावणी करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ अंतर्गत २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर रेकॉर्डवरील ९९ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी १५१७ वाहनांची कसून तपासणी केली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३०५ वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) बबन आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारची मोहिम अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे.