…आणि पालकमंत्र्यांनी टोलविला सिक्सर !

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील बोरनार क्रिकेट क्लबतर्फे आजपासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सिक्सर टोलवून या स्पर्धेस प्रारंभ केला.

बोरनार क्रिकेट क्लबतर्फे आजपासून जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा सुरू झालेली आहे. आज सकाळी बोरनार येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते चेंडू टोलवून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत अनुक्रमे ११ हजार, ७ हजार आणि ५ हजारांची तीन पारितोषिके आहेत. यात जिल्ह्यातील सुमारे २० संघ सहभागी होणार आहेत. आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातर्फे म्हसावद येथील संघर्ष बी विरूध्द पारोळा येथील जय बजरंग या संघातील सामन्याचा टॉस करण्यात आला. नंतर पालकमंत्र्यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. हुकला तो संपला या गाण्याने क्रिकेटचे यथार्थ वर्णन केले असून आपल्या जीवनाला देखील हा नियम लागू होतो. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा, आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी पंचायत समितीच्या उपसभापतींचे पती समाधान चिंचोरे, म्हसावदचे सरपंच गोविंद पवार, बोरनार येथील सरपंचांचे पती नाना पाटील, उपसरपंच बानू थोरात, सुनील बडगुजर, सुनील मराठे, इबा पठाण, आशिष पटेल, नारायण चव्हाण, सचिन दामले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content