चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातर्फे नुकतेच वाड:मय मंडळाच्या उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कै.सौ.शरश्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभाग प्रमुख किशोर खंडागळे व विद्यार्थी यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. याप्रसंगी उदघाटक व प्रमुख पाहुणे डॉ.आशुतोष पाटील (अध्यक्ष, मराठी अभ्यास मंडळ, क.ब.चौ. उमवि, जळगाव), कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, सौ.एम.टी.शिंदे, ए.बी.सूर्यवंशी (प्रमुख, वाड:मय मंडळ) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय डी.एस.पाटील यांनी करून दिला.
याप्रसंगी डॉ. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे तसेच भाषेच्या विद्यार्थ्यांनी विषयाची निवड करतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्यामधील वेगळेपणा व कौशल्य, क्षमता, स्वतःची ओळख, पात्रता या गोष्टी ओळखून व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे. आपण घेत असलेल्या शिक्षणातून मनातील न्यूनगंड दूर होऊन आत्मविश्वास जागा व्हायला हवा. मराठी भाषा संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या बोलीत बोलले पाहिजे, त्यांच्या या भाषेविषयी कोणतीही न्युनतेची भावना मनात ठेवू नये. मराठी भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी वाचक, मराठी भाषिक व बोली भाषिक यांची आहे हे ध्यानात घेतले पाहिजे.