आता पोलिसांमध्येच पक्ष आले तर या देशाचे काय होईल ? : ना. पाटील यांचा सवाल

मुंबई । आधी गावात, खेड्यात वा वाड्यांमध्ये पक्ष होते. आता पोलिसांमध्येच पक्ष आले तर या देशाचे काय होणार ? असा सवाल करत राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बिहारचे डीजीपी गुप्तेश्‍वर पांडे यांनी तब्बल पाच वर्षे आधी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकीय कारकिर्द सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. यावर विरोधक सडकून टीका करत आहेत. नेमका हाच सूर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी देखील लावला आहे. या संदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलतांना ना. पाटील यांनी गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

या संदर्भात ना. पाटील म्हणाले की, गुप्तेश्‍वर पांडे हे पहिल्यापासूनच ज्या पध्दतीत बोलत होते ते संशयास्पदच होते. अगदी साधा हवलदार देखील एक वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेत नसतांना डीजीपी पदावरील एखादा व्यक्ती पाच वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याची बाब संशयास्पद आहे. आधी गावात, खेड्यांमध्ये वा वाड्या-वस्त्यांमध्ये पक्ष होते…आता पोलिसांमध्येच पक्ष असेल तर या देशाचे काय होणार ? असा खडा सवाल करत त्यांनी गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर हल्लाबोल केला.

Protected Content