शिवसेनेने आता स्वस्थ बसावे ! : आ. गिरीश महाजन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या अडीच वर्षात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारे सरकार इतिहासजमा झाले असून शिवसेनेने आता स्वस्थ बसावे असा टोला माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. तसेच आता विकासाचा बॅकलॉग भरून निघणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळपासूनच बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. यातच आता भाजपचे महत्वाचे नेते त्यांच्या सागर या निवासस्थानी जमा होत आहेत. या अनुषंगाने सागरवर दाखल झाल्यावर आमदार गिरीश महाजन यांनी टिव्ही नाईन या वाहिनीला दिलेला मुलाखतीत शिवसेनेवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, अतिशय भ्रष्ट असणारे महाविकास आघाडी सरकार पडल्याचा आम्हाला आनंद असून याचाच उत्सव आज दुपारी साजरा करण्यात येणार आहे.

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, अडीच वर्षात राज्यात काहीच कामे झाली नव्हती. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर विकासाचा बॅकलॉग हा खर्‍या अर्थाने भरून निघणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. तर भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे त्यांनी म्हणाले. शिवसेनेने दगाबाजी केल्याचे फळ त्यांना मिळाले असून सरकार गेल्यामुळे आता त्यांनी स्वस्थ बसावे असा टोला देखील त्यांनी मारला.

Protected Content