Home क्रीडा खळबळजनक ! १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री ; सचिन...

खळबळजनक ! १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री ; सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम मोडला

0
16


मुंबई-वृत्तसेवा । भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची चाहूल देणारी एक मोठी घटना घडली आहे. अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात स्थान मिळवत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आयर्लंड आणि इंग्लंड मालिकांसह आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय टी-२० संघात त्याची निवड झाली असून, यामुळे त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा सर्वात कमी वयात भारतीय संघात निवड होण्याचा ऐतिहासिक विक्रमही मोडीत काढला आहे.

बीसीसीआयने शनिवारी आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र सर्वाधिक चर्चा वैभव सूर्यवंशीच्या निवडीची होत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या या युवा क्रिकेटपटूने आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघात स्थान मिळवत भारतीय क्रिकेट इतिहासात नवे पान लिहिले आहे.

यापूर्वी सर्वात कमी वयात भारतीय संघात निवड होण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी सचिन यांची भारतीय संघात निवड झाली होती. त्यावेळी त्यांचे वय १६ वर्षे १८१ दिवस होते. नंतर त्यांनी १६ वर्षे २०५ दिवस वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र आता वैभव सूर्यवंशीने १५ व्या वर्षीच वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

वैभव सूर्यवंशीच्या निवडीमागे त्याची आयपीएलमधील दमदार कामगिरी हे प्रमुख कारण मानले जात आहे. यंदाच्या हंगामात त्याने अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत क्रिकेट चाहत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्याच्या सातत्यपूर्ण धावसंख्येमुळे तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. आयपीएलच्या हंगामात वैभवने तब्बल ७७६ धावा करत ऑरेंज कॅप पटकावली. या कामगिरीदरम्यान त्याने अनेक विक्रम मोडले आणि काही नवे विक्रमही आपल्या नावावर नोंदवले. त्याच्या फलंदाजीतील आत्मविश्वास, तांत्रिक परिपक्वता आणि मोठ्या सामन्यांतील प्रभावी कामगिरीमुळे निवडकर्त्यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला असल्याचे मानले जात आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना संधी देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड महत्त्वाची मानली जात आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कामगिरी कशी राहते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. त्याच्याकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा असून तो भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून पाहिला जात आहे. वैभव सूर्यवंशीची भारतीय संघातील निवड ही केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून भारतीय क्रिकेटमधील नव्या पिढीच्या उदयाचे प्रतीक मानली जात आहे. सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडत त्याने इतिहास रचला असून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही तो आपल्या कामगिरीने नवा अध्याय लिहिणार का, याची उत्सुकता क्रिकेटविश्वाला लागली आहे.


Protected Content

Play sound