‘नमस्ते ट्रंप’ मुळेच कोरोनाचे आक्रमण पसरले-शिवसेना

मुंबई । राज्यकर्त्यांनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करत ट्रंप यांना ऐन कोरोना काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही अशा शब्दात शिवसेनेने आज केंद्र सरकारवर टीका केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात आज अमेरिकेतील निकालावर भाष्य करत केंद्र सरकारला टोले मारण्यात आले आहेत. यात म्हटले आहे की, अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. त्याच वेळी हिंदुस्थानातील बिहारच्या विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव होताना स्पष्ट दिसत आहे. आपल्याशिवाय देशाला किंवा राज्याला पर्याय नाही, या भ्रमातून नेत्यांना बाहेर काढण्याचे काम लोकांनाच करायचे असते.

यात पुढे म्हटले आहे की, ट्रंप यांच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व हिंदुस्थानातील भाजप पुढारी व राज्यकर्ते नमस्ते ट्रम्पसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते. ट्रम्प यांना ऐन ङ्गकोरोनाफ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही. आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण संपवले ते कायमचे. याआधी ट्रम्प यांनी कोरोनासंदर्भात फक्त विनोद, मजा, टाईमपासच केला होता. ट्रम्प यांचा पराभव म्हणजे माजोरडेपणाचा, पैशांच्या मस्तीचा पराभव आहे. हाती सत्ता, पैसा आणि टगे मंडळींची टोळी असली की, हवे ते साध्य करता येते या मस्तीचा पराभव आहे. लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघडया घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही. चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल.

यात शेवटी नमूद केले आहे की, हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच जनता हीच श्रेष्ठ व सर्वशक्तिमान आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत असल्याचे यात म्हटले आहे.

Protected Content