नवी दिल्ली (प्रतिनिधी) टाइम्स नाऊ आणि व्हिएमआर यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, बालाकोट हवाई हल्ल्यानंतर एनडीएला १३ जागांचा फायदा होणार आहे. हल्ल्यापूर्वी एनडीला २७० जागा मिळणार असल्याचे सर्वेक्षणात दाखवण्यात आले होते. मात्र, ५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीदरम्यान केल्या गेलेल्या सर्वेक्षणात या आकड्यात वाढ होऊन तो २८३वर पोहोचला आहे.
भारतीय हवाई दलाने १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्यानंतर २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून हवाई हल्ला केला होता. याचा परिणाम केवळ एनडीएवरच नव्हे तर काँग्रेस आणि सहकारी पक्षांवरही होणार आहे. यामुळे काँग्रेस आघाडीच्या जागा घटतील, त्यांच्या जागांचा आकडा १३५ राहिल असा अंदाज आहे. जो हवाई हल्ल्यापूर्वी १४४ इतका राहिल असे भाकीत वर्तवण्यात येत होते.
देशातील तिसऱ्या आघाडीतील पक्षांच्या जागाही कमी होताना दिसत आहेत. हवाई हल्ल्यापूर्वी तिसऱ्या आघाडीला १२९ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवाई हल्ल्यानंतर मात्र, त्यांना ४ जागांचे नुकसान होणार आहे. यामुळे तिसऱ्या आघाडीचा जागांचा आकडा १२५वर येऊन थांबला आहे. तिसऱ्या आघाडीत बीजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, तेलुगू देसम, तेलंगण राष्ट्र समिती आणि वायएसआर काँग्रेस यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल एकत्र निवडणुका लढवत आहेत.