जळगाव, प्रतिनिधी | नाट्य आणि साहित्य क्षेत्राला वाहून घेतलेल्या शहरातील ‘परिवर्तन’ या संस्थेतर्फे येत्या २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान यंदा ‘अभिवाचन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गाजलेल्या कादंबऱ्यांचे अभिवाचन करून त्या साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘परिवर्तन’ने राज्यात सर्वप्रथम सुरु केले. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष आहे.
दरवर्षी वेगवेगळ्या कादंबऱ्या शहरातील वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आणि त्या लोकप्रिय करण्यात संस्थेला यश आले आहे. आता तर अभिवाचनाची चळवळ राज्यात उभी राहतेय. शहरातील काही शाळांमध्ये गेल्या वर्षापासून स्नेह्संमेलनातील स्पर्धांमध्ये ‘अभिवाचन’ स्पर्धा घेण्यात येऊ लागली हे ही या चळवळीचे मोठे यश आहे. आजच्या धावपळीच्या आणि इलेक्ट्रॉनिक क्रांतीच्या युगात वाचनसंस्कृती समाजात रुजवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. या प्रयत्नाला हातभार लावण्याच्या व ही संस्कृती जपण्याच्या हेतूने ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ने आज (दि.१९) ‘परिवर्तन’ या संस्थेतील काही मान्यवर सदस्यांचा सहभाग असलेले एक चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात हर्षल पाटील, मंजुषा भिडे, अंजली पाटील, सोनाली पाटील व मोना तडवी निंबाळकर यांनी सहभाग घेतला तर सूत्र संचालन रंगकर्मी प्रमोद माळी यांनी केले.