सावदा प्रतिनिधी । सावदा ते थोरगाव्हण रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून माती मिश्रित खडीचा वापर करून या रस्त्याचे काम केले जात असल्याची तक्रार येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
राजेश वानखेडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावदा व थोरगाव्हण शिवारातील या रस्त्यालगत असलेल्या शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्याच्या दुतर्फा शेतकर्याच्या बांधाची लागून संबंधित ठेकेदाराकडून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर गटारी खोदण्याचे काम चालू आहे. त्या गटारी खोदत असताना अनेक शेतकर्यांच्या पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. तसेच आता पावसाळ्याचे दिवस असून शेतकर्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्ता देखील संबंधित ठेकेदाराने ठेवलेला नाही. याआधीच कोरोना विषाणू मुळे शेतकर्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले असून आता सावदा थोरगव्हाण शिवारातील शेतकर्यांवर हे सुलतानी संकट आले असून या संकटाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधीत शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी व उपाययोजना कराव्या जेणेकरून खरीप हंगामात शेतकर्याला शेती करायला सोयीचे व सुलभ जाईल व समंधीत ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
दरम्यान, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था या विभागाचा अत्यंत ढिसाळ कारभार असून संबंधित विभागा बाबतीत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील अनभिज्ञ असल्याचे राजेश वानखेडे यांनी या निवेदनात म्हटले आहे.