मोदींच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ; ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या उपाध्यक्षांची टीका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातील डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था  इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नवज्योत दाहिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  कोरोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं म्हटलं आहे.

 

देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना राजकीय सभा घेणे , कुंभमेळ्यासारख्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सहमती दर्शवल्याने कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने डॉ. नवज्योत यांनी मोदींना सुपर स्प्रेडर   म्हटलं आहे. सुपर स्प्रेडर म्हणजे अशी व्यक्ती जिच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग होतो.

 

नियम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावे यासाठी आरोग्य सेवेतील लोकं काम करत असतानाच दुसरीकडे पंतप्रधानांनी मोठ्या प्रचार सभांना संबोधित करण्यासंदर्भातील निर्णय घेताना मागे पुढे पाहिले नाही. त्यांनी सर्व नियम मोडले,” असं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.

 

देशामध्ये पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये आढळून आला, असं सांगत डॉ. नवज्योत यांनी त्यावेळीही मोदींनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही असं म्हटलं आहे. डॉ. नवज्योत यांनी, “देशातील पहिला रुग्ण जानेवारी २०२० मध्ये देशात आढळल्यानंतर मोदींनी उपाययोजना करुन प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात काम करण्याऐवजी गुजरातमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांसाठी लाखो लोकांना एकत्र करुन सभा घेतली,” असं म्हटलं आहे.

 

“आता दुसरी लाट अद्याप सर्वोच्च स्तरावर (पीकवर) पोहचलेली नसतानाही देशातील आरोग्य सेवा डळमळत असल्याचं चित्र दिसत असतानाही पंतप्रधानांनी मागील वर्षभरामध्ये आरोग्यसेवा मजबूत करण्यासंदर्भात काही निर्णय घेतल्याचं दिसून आलं नाही,” असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत.

 

आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली असून सध्याची देशातील परिस्थिती ही मोदींच्या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम असल्याचं अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी रुग्ण दगावत असल्याचं डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. “अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लॅण्ट उभारण्यासंदर्भातील होकार केंद्राने न दिल्याने प्रकल्प रडखले आहेत. मोदी सरकारने या गोष्टींना फार महत्व दिलं नाही,” अशी टीका नवज्योत यांनी केलीय.

 

देशातील अनेक शहरांमध्ये स्मशानभूमींबाहेर अंत्यविधीसाठी लागलेल्या रांगा या परिस्थितीची दाहकता दर्शवणाऱ्या आहेत, असंही डॉ. नवज्योत म्हणाले आहेत. “शेतकरी आंदोलनासंदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग्य ते निर्णय घेतले नाही. मोठ्या प्रमाणात आंदोलक शेतकऱ्यांना एकत्र येऊ दिलं. प्रश्न सोडवण्यापेक्षा आंदोलन होऊ दिलं आणि त्या माध्यमातून धोका वाढला,” असं डॉ. नवज्योत म्हणाले. बाबा राम देव यांच्या पतांजलीच्या औषधांना समर्थन देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरही डॉ. नवज्योत यांनी टीका केली.

Protected Content