माउंट माउंगनुई (वृत्तसंस्था) भारताने पाच टी-20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूजीलंडचा 7 धावांनी पराभव करत मालिका 5-0 ने आपल्या खिशात घातली. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. भारताने विजयासाठी दिलेले १६४ धावांचे आव्हान यजमान संघाला पेलवले नाही. भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचे पारडे न्यूझीलंडच्या फिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.