खलिस्तान कमांडो फोर्सचा शेतकरी नेत्याच्या हत्येचा कट

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीच्या सीमांवर शेतकरी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांची हत्या घडवून आणण्यासाठी खलिस्तान कमांडो फोर्सच्या  माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कट रचला जात असल्याचा धक्कादायक खुलासा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.

 

भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ आणि इंटेलिजेन्स ब्युरोकडून केसीएफ या दहशतवादी संघटनेच्या हालचालींकडे लक्ष ठेवलं जात आहे. काही दिवसांपूर्वी याचसंदर्भात गुप्तचर यंत्रणांनी एक अहवाल तयार केला  आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेल्या माहितीच्या आधारे अहवाल तयार करण्यात आला आहे. या अङवालानुसार भारताविरोधात कट रचणारे लोकं बेल्जियम आणि यूनायटेड किंग्डममधील आहेत. या सर्वांनी मिळून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांपैकी एकाच्या हत्येचा कट रचला आहे.

 

केसीएफच्या योजनेनुसार शेतकरी आंदोलनामध्ये असणाऱ्या अशा नेत्याची हत्या करण्याचा विचार आहे की ज्याने पंजाबमध्ये केसीएफ संपुष्टात आणण्याचं काम केलं आहे. केसीएफ एक दहशतवादी संघटना असून देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी हत्या घडवून आणल्याचा आरोप या संघटनेवर आहे. ही संघटना कॅनडा, युनायटेड किंग्डम, बेल्जियम आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये पसरलेली आहे.

 

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार केसीएफ आता एका वरिष्ठ शेतकरी नेत्याच्या हत्येचा कट रचत असून यासंदर्भातील माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. बेल्जियम आणि युनायटेड किंग्डममधील तीन दहशतवाद्यांनी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला आहे. “सध्याच्या परिस्थितीमध्ये या नेत्याची हत्या केल्यास भारतामध्ये हिंसा भडकू शकते आणि हत्येचा आरोप सरकारी यंत्रणा किंवा कोणत्यातरी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केला जाईल,” असा विचार केसीएफ करत आहे.

 

खालिस्तान समर्थक गटांकडून शेतकरी आंदोलनाच्या आडून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. पाकिस्तानमधून चालवण्यात येणारे ४०० हून अधिक ट्विटर हॅण्डलवर भारताने बंदी घातली आहे. खलिस्तानी समर्थकांची पाठ राखण करणे आणि हिंसा भडकवण्यासाठी या ट्विटर हॅण्डलचा वापर केला जायचा.

 

२६ जानेवारीच्या आसपास लाल किल्ल्याजवळ शेतकरी आंदोलक जमा झाले होते तेव्हा अमेरिकेमध्ये खलिस्तान समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासासमोर आंदोलन केलं होतं. आंदोलनकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आम्ही एकत्र आलो होतो असा दावा केला आहे. मात्र गर्दीमध्ये खलिस्तानचे झेंडे दिसून आल्याचा दावा करण्यात आला होता.

Protected Content