आंदोलक शेतकऱ्यांचा आता १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोकोचा इशारा !

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी  आक्रमक करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. बुधवारी संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दुपारी १२ ते ४ असे चार तास हे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आंदोलनकर्त्यांनी १२ फेब्रुवारीपासून राजस्थानाच्या रस्त्यांवरील सर्व टोल वसुली करु न देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

संयुक्त किसान मोर्चाने प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीला देशभरात कॅण्डल मार्च आणि मशाल मोर्चा काढला जाणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी हा मोर्चा काढला जाईल.

 

दुसरीकडे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान कृषी कायद्यांवर मोदींनी  भाष्य केलं. “आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरु आहे तेथील शेतकरी चुकीची माहिती आणि अफवांना बळी पडले आहेत. आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करतं. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. आदर आणि सन्मानाने करत आहेत,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.

Protected Content