मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | केंद्रातील भाजप सरकारने भारतीय सैन्यातील ‘अग्निपथ भरती’ प्रक्रिया त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कमेटी मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, भारतीय सैन्यातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजप सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली आहे. यामुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. संपूर्ण देशभर अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलने होत आहे. तरी केंद्र सरकारने त्वरित ही योजना मागे घ्यावी व रद्द करावी अशी मागणी मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेसच्या वतीने करण्यात अली आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, व्ही. जे. एन. टी. प्रदेश प्रवक्ते अॅड. अरविंद गोसावी, एस. ए. भोईसर आदींची स्वाक्षरी आहे.