चाळीसगाव (प्रतिनिधी) निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणार्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला आज शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगीनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनासाठी निसर्गाकडे मनोभावे प्रार्थना केली.
दरवर्षी मान्सूनपूर्व सरींनी वटपूजेचा सण आनंदात होत असतो. पूर्वीच्या काळी मातीचा ओला गंध, अंकुरलेले कोवळे तृणांकुर, पसरलेली हिरवाई आणि थंड आल्हाददायक वातावरणात वटपूजा साजरी व्हायची, पण गेली अनेक वर्षे वटपूजा कडक उन्हात साजरी होत आहे. प्रकृतीच्या सृजनशीलतेचा व नवनिर्मितीच्या प्रारंभी येणाऱ्या वटवृक्षपूजेतून सन्मानित व्हावे आणि निसर्ग सर्वार्थाने बहरावा आणि धरती सृजनशील व्हावी म्हणून या महिलांनी आज निसर्गाकडे दान मागितले.
निसर्ग प्रफुल्लीत राहिला तर मानवी जीवन समाधानी राहील म्हणून आज गृहिणीनी नवनिर्मितीचा प्रणेता असलेल्या सजीव वरुणदेवाची व वर्षाॠतुची वटपूजा बांधून मनोभावे प्रार्थना केली. ‘सर्व चराचर सृष्टीची भरभराट होवो, पाऊस चांगला पडो, शिवारात धनधान्य उपजो’ अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. यावेळी शोभा कोतकर, सुनंदा ब्राह्मणकर, अलका शाह, कविता साळुंखे, जयश्री भोकरे, योगिनी ब्राह्मणकर, निर्मला महाजन, छाया महाजन आदी महिला भगीनी उपस्थित होत्या.