आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत : राज ठाकरे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या फडणवीस सरकारच्या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे – “आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत!”

राज ठाकरे यांनी आपल्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट शेअर करत यासंदर्भात आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं, “हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांप्रमाणे एक राज्यभाषा आहे. मग ती महाराष्ट्रात पहिलीपासून सक्तीने का शिकवायची?” असा सवालही उपस्थित केला. राज यांनी पुढे स्पष्ट केलं की, “तुमचं त्रिभाषा सूत्र हे सरकारी व्यवहारांपुरतं मर्यादित ठेवा. शिक्षण क्षेत्रावर ते लादू नका. ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.” त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला की, देशभरात हिंदीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत आणि हे प्रयत्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत.

राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात भाषेच्या सन्मानावरही भर दिला. ते म्हणाले, “प्रत्येक भाषेचा एक इतिहास, परंपरा आणि संस्कृतीशी असलेला संबंध असतो. जशी मराठीचा सन्मान महाराष्ट्रात राखला गेला पाहिजे, तसा इतर राज्यांत तिथल्या भाषेचा सन्मान राखणं आवश्यक आहे.” ते पुढे म्हणाले की, इतर राज्यांत राहणाऱ्या मराठी जनतेनेही त्या राज्याची भाषा आपली मानावी, हा आमचा आग्रह आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की इथे दुसऱ्या राज्याची भाषा लादली जावी.

राज ठाकरे यांच्या मते, येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध मराठीतर असा कृत्रिम संघर्ष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा डाव सत्ताधाऱ्यांकडून रचला जात आहे. ते म्हणाले, “मराठीतर भाषिकांनी देखील सरकारच्या या खेळीचा निष्पक्षपणे विचार करावा. यामागे कोणताही भाषाभाव नाही, हा राजकीय स्वार्थ आहे.” राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील भाषिक राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी येण्याची शक्यता असून, हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

Protected Content