


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या धरणाचे चार रेडियल गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता असल्याने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या स्थितीनुसार हतनूर धरणाची पाणीपातळी 211.970 मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणात सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 72.29 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन धरणाचे चार रेडियल गेट 0.5 मीटरने उघडे ठेवण्यात आले आहेत. सध्या धरणातून 5,368 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात करण्यात येत आहे. तसेच सिंचनासाठी कालव्यामधून 300 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. धरण परिसरात आज पावसाची नोंद झालेली नसली तरी यंदाच्या हंगामात आतापर्यंत 49 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आगामी काळात वरच्या भागात पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे तसेच शेतीची आवश्यक खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



