


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधील मोहन टाकीपासून ते जुना खेडी नाल्यापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापौर दिपमाला काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मोहन टाकी ते जुना खेडी नाल्यापर्यंतचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या समस्येत आणखी वाढ झाली असून, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारक करतात. मात्र, खराब रस्त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहनांचे नुकसान होत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नागरिकांनी महापौर दिपमाला काळे यांना दिलेल्या निवेदनातून सदर रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच येत्या १५ दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांच्या वतीने महापालिकेविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मोहन टाकी ते जुना खेडी नाल्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गंभीर समस्या बनली असून, महापालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मार्ग सुकर करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



