विधानभवनाच्या समोर धडकला वंचितचा मोर्चा

मुंबई प्रतिनिधी | ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज विधानभवनाच्या समोर जोरदार आंदोलन केले. यानंतर आता राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ओबीसी आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीने आधीच विधानसभेसमोर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. यानुसार आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज विधानभवनावर वंचितच्या मोर्चाने धडक दिली. ओबीसींना आरक्षण मिळालच पाहिजे, अशी मागणी करतच हे आंदोलक विधानभवन परिसरात धडकले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या दोन्ही सरकारांना ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाहीये, असा दावा आंबेडकर यांनी केला. मंडल आयोगापेक्षाही आता मोठी लढाई असणार आहे. आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही. राज्यभर हे आंदोलन घेऊन जाऊ. तालुका आणि गावपातळीपर्यंत ही लढाई लढली जाईल, असं आंबेडकर म्हणाले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालंच पाहिजे. ओबीसींची जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे. एकदा जनगणना केली तर राजकीय आरक्षणही आपोआप मिळेल, असं ते म्हणाले. या सरकारने केवळ ओबीसीच नव्हे तर मराठा आरक्षणाचंही वाटोळं केलं आहे. गरीब मराठ्यांना वार्‍यावर सोडण्याचं काम या सरकारने केलं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षासाठी आता गाव पातळीपर्यंत लढा नेणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली. सरकार आणि विरोधकांना ओबीसी आरक्षणासाठी काहीही देणे-घेणे नसल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

Protected Content