अंडरवर्ल्डचा शार्पशूटर व्यसनमुक्तीने बनला मॅरेथॉन रनर !

 

 

68096905

 

 

पुणे (वृत्तसंस्था) एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये असलेला कुख्यात टोळीचा शार्पशूटर. त्याच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे त्याला अनेक वर्ष आर्थर रोडच्या कारागृहात शिक्षा भोगावी लागते. शिक्षा संपल्यानंतर तो मुक्तांगण संस्थेच्या संपर्कात येतो आणि खऱ्या अर्थाने वाल्याचा वाल्मिकी होतो. आधी पोलिसांच्या भीतीने किंवा एखाद्याला मारण्यासाठी त्यांच्या मागे धावणारा गुंड एका संस्थेच्या प्रयत्नांनी मुंबई ते दिल्ली इतक्या अंतराची मॅरेथॉन धावतो. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातून व्यसनमुक्त झालेल्या राहुल जाधव यांच्या कहाणीने उपस्थित अंतर्मुख झाले.

 

मुक्तांगण मित्रतर्फे आयोजित मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून ते दिल्लीच्या इंडिया गेटपर्यंतची मॅरेथॉन यशस्वीपणे पार करणाऱ्या राहुल जाधव यांच्या सत्कारसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यामध्ये राहुल यांनी आपली कहाणी सांगून व्यसनमुक्ती झाल्यानंतर जगत असलेल्या सन्मानाच्या आयुष्याची कथाच सर्वांना सांगितली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मोर्डे फूडसचे संचालक हर्षल मोर्डे, मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर आदी या वेळी उपस्थित होते.

‘एकेकाळी मी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून कुप्रसिद्ध होतो. ऑर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतर एक व्यसनाधीन, वाया गेलेला तरुण म्हणून माझ्याकडे बोट दाखवले जायचे. पण पुण्यातील मुक्तांगणमुळे व्यसनापासून मुक्त झालो. यामुळे जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. व्यसनाबरोबरच गुन्हेगारीपासूनही मुक्त होण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील शार्प शूटरपेक्षा मुक्तांगणचा व्यसनमुक्त कार्यकर्ता ही ओळख मला आता जास्त आवडू लागली आहे,’ असे सांगताना राहुल जाधव यांच्यासह उपस्थितांनाही गहिवरून आले. ‘व्यसनाधीन लोकांशी बोलून त्यांचे मन वळविताना मला खूप समाधान मिळते. आपल्याला मिळालेले अनमोल जीवन व्यसने किंवा गुन्हेगारीमुळे व्यर्थ जाते, हे स्वतः अनुभवले आहे. त्यामुळे या वाटेवर असणाऱ्या प्रत्येकाला जीवनाची खरी वाट दाखविणाऱ्या मुक्तांगणसारख्या संस्था मला खूप महत्त्वाच्या वाटतात,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मुंबई ते दिल्ली दरम्यान दी अॅडिक्शन अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून ते दिल्लीच्या इंडिया गेटपर्यंतचे सुमारे १४७५ किलोमीटरचे अंतर राहुल जाधव यांनी २० दिवसांच्या कालावधीत पार केले.

Add Comment

Protected Content