‘त्या’ थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील ! : ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्याच्या राजकीय स्थितीवर आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामधून जोरदार भाष्य करत शिंदे गटावर शरसंधान करण्यात आले आहे.

दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, सत्याला आणि खुनाला वाचा फुटतेच असे म्हणतात, पण मिंधे-फडणवीस युगात असत्यालाही वाचा फुटू लागली आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांचे सध्याचे सूत्रधार हे नामर्द आहेत म्हणून त्यांनी थेट लढण्याऐवजी शिवसेनेचे अस्तित्व कागदोपत्री संपविण्याचा दळभद्री प्रकार केला. त्यांनी मिंधे गटाच्या बृहन्नडांना, शिखंडींना पुढे करून शिवसेनेच्या पाठीत बाण खुपसला. महाराष्ट्र त्यामुळे आकांत करीत आहे. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. राज ठाकरे यांनीही त्यांचा मार्ग स्वीकारला. त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर आणि व्यक्तिशः आमच्यावर कठोर शब्दांत टीका केली, पण ज्या शिवसेनेचा जन्म प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादातून झाला, ज्या प्रबोधनकारांनी मराठी माणसांच्या संघटनेस ‘शिवसेना’ हे ज्वलंत नाव दिले व ज्या शिवसेनेसाठी आपले सुपुत्र बाळ केशव ठाकरे यांना महाराष्ट्र सेवेसाठी अर्पण केले, त्या शिवसेनेचे अस्तित्व मिटविण्याचे अधम व नीच कृत्य जसे एकनाथ शिंदे या गारद्याने केले, तसे या मंडळींनी केले नाही.

यात पुढे नमूद केले आहे की, निवडणूक आयोगाच्या राजकीय बापांना वाटत असेल, या अरेरावीमुळे शिवसेनेचा पराभव करता येईल. शिवसेना खचून जाईल. छे, छे! शिवसेना ही काही तुमच्या खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. स्वाभिमानाच्या मजबूत पायावर ती ५६ वर्षांपासून न डगमगता उभी आहे. अनेक वादळे आणि घाव झेलून तिने झंझावात कायम ठेवला आहे. शिवसेना संपवू अशी स्वप्ने पाहणाऱयांच्या गोवर्‍या सोनापुरात रचून शिवसेनेने अनेक अग्निपरीक्षा पार केल्या आहेत. ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार आहे.

या परिस्थितीला शरण जाणार नाही, असे महाराष्ट्र दिल्लीकडे बघून गर्जत आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंडयाची कातडीही जळून जाईल. छे छे! यांना जाळायचे कसे? ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे. त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ‘येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे!’ त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील! हे राज्य श्रींचे आहे. शिवरायांचे आहे. शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार? असे यात म्हटले आहे.

Protected Content