दोन सहकारी बँकांवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई

RBI

मुंबई, वृत्तसंस्था । नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत शहरातील दी. जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि पुण्यातील जनता बँकेला आरबीआयने २५ लाखांचा दंड ठोठावला आहे. या दंडामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पंजाब- महाराष्ट्र बँकेनंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचा भंग केल्याप्रकरणी आरबीआयने पुण्यातील जनता सहकारी बँक आणि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला २५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचबरोबर ऑगस्ट २०१५ पासून पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात करणाऱ्या बंधन बँकेने प्रवर्तक हिस्सेदारी ४० टक्क्यांवर न आणल्याबद्दल आरबीआयने एक कोटी रुपयाचा दंड केला आहे.

जनता सहकारी बँक आणि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकांवर मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) निकष, एक्सपोजर मानदंड आणि वैधानिक / इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयच्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट १९४९ च्या तरतुदींनुसार हा दंड आकारण्यात आला आहे, असे बँकेने नमूद केले आहे.
तांत्रिक कारणांनी दंड :- दरम्यान हा दंड केवळ काही तांत्रिक कारणांमुळे करण्यात आला असून त्यात आर्थिक अनियमिततेचा काही संबंध नाही. अशी माहिती पीपल्स बँकेने एका पत्रकाद्वारे कळवली आहे. काही कर्जदारांनी हप्ते सुलभीकरणाची मागणी, काही कर्जदारांनी कर्ज रकमेचा योग्य विनियोग केलेला नसणे, अशा तांत्रीक कारणांमुळे हा दंड करण्यात आला असून अशाप्रकारे रिझर्व्ह बँक वेळोवेळी अनेक बँकांना दंड करीत असते. ती एक नियमित प्रक्रिया आहे, त्यात वेगळे काहीही नाही, असेही बँकेने या पत्रकात म्हटले आहे.

Protected Content