जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात सोमवारी घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. लग्नानंतर अवघ्या सहा दिवसांतच एका २१ वर्षीय नवविवाहितेचा भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
मयत विवाहितेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. वैशाली हिचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर (गुजरात पेट्रोल पंप परिसर) येथील पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शन करून काही दिवसांपूर्वीच घरी परतले होते.

सोमवारी (१३ जुलै) वैशालीला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचे काका सासरी आले होते. दुपारी जेवण झाल्यानंतर दोघे दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले. दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास जळगाव विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात वैशालीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत दोघांनाही जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती वैशालीला मृत घोषित केले. तिच्यासोबत असलेले काका गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लग्नाला अवघे सहा दिवस झाले असताना घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयात एकच आक्रोश उसळला असून नातेवाईकांचा शोक अनावर झाला. परिसरातही या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्याबरोबरच घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



