जळगाव लाईव्ह ट्र्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून ९ एप्रिल रोजी चोरीला गेलेल्या तीन महागड्या चारचाकी वाहनांचा तब्बल महिनाभरानंतर जळगाव पोलिसांनी छडा लावला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशातून या वाहनांचा शोध घेत दोन संशयितांना बुधवारी (७ मे) दुपारी १२ वाजता अटक केली आहे, तसेच दोन चोरीच्या गाड्याही हस्तगत केल्या आहेत.
शहरातील जिल्हापेठ, रामानंदनगर व जळगाव तालुका पोलिस ठाण्यात या वाहनचोरी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास सुरू होता. त्याचवेळी, एलसीबीचे पथकही समांतर तपास करत होते. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, परंतु ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांना त्यांच्या एका गुप्त खबऱ्याकडून या वाहनांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी काही मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनांचे धागेदोरे राजस्थानमधील सांचोर, जिल्हा जालोर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल यांनी तीन पोलिसांच्या पथकासह तातडीने राजस्थान गाठले.
राजस्थानातील सांचोर येथे स्थानिक पोलिसांनी मदत केल्यानंतर, एलसीबीच्या पथकाने सुनील पीता केशाराम बिष्णोई (वय २५) आणि सुनील पीता ओमप्रकाश बिष्णोई (वय २४, दोघेही रा.सरनाऊ, ता.सांचोर, जि.जालोर, राजस्थान) या दोन संशयितांना अटक केली. या दोघांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर दोन साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. अटक केलेल्या दोन्ही संशयितांना पोलिस कर्मचारी अतुल वंजारी व हरीलाल पाटील यांनी राजस्थानमधून जळगावला आणले. तर, उपनिरीक्षक शरद बागल यांनी त्याच परिसरात तळ ठोकून तपास सुरू ठेवला. काही दिवस विरळ वस्ती असलेल्या वालुकामय भागात शोध घेतल्यानंतर, एका जंगलात पोलिसांना बेवारस स्थितीत एक कार आढळून आली. या कारचा फोटो फिर्यादीला पाठवल्यानंतर, ती चोरीला गेलेली कार असल्याची खात्री झाली. पोलिसांनी तत्काळ ही कार ताब्यात घेऊन जळगावला आणली आहे. उर्वरित आरोपी आणि तिसऱ्या चोरीच्या कारचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एलसीबीच्या या यशस्वी कारवाईमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्याला मोठे यश मिळाले आहे.