
रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेले पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अनेक महिन्यांच्या परिश्रमाने जोपासलेली केळीची पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

तामसवाडी येथील शेतकरी अनिल पाटील यांनाही या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. कर्ज काढून तसेच उसनवारी करून त्यांनी उभारलेली केळीची बाग वादळी वाऱ्याच्या तडाख्यात पूर्णपणे कोसळली. कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या अनिल पाटील यांना त्यांच्या मुलांनी बागेच्या नुकसानीची माहिती दिल्यानंतर मोठा धक्का बसला. अनेक महिन्यांच्या कष्टानंतर तयार झालेले पीक एका झटक्यात नष्ट झाल्याने त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब चिंतेत सापडले आहे.
तामसवाडीसह खिरवळ, मोरगाव, वाघोड, अहिरवाडी, निरूळ आणि पाडळे परिसरातील शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर केळी पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून काही ठिकाणी पूर्ण बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे.
रावेर तालुका हा केळी उत्पादनासाठी देशभर प्रसिद्ध आहे. येथील हजारो शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था केळी पिकावर अवलंबून आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाढते उत्पादन खर्च, मजुरी, खते व औषधांच्या वाढत्या किमती आणि त्यातच आलेली ही नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीष महाजन आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.
वादळी पावसाच्या या तडाख्यामुळे रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले असून शासनाकडून तातडीची मदत, नुकसानभरपाई आणि दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे असलेले उत्पन्नाचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



