रेमंड चौफुलीवर रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून जबरी लुटणाऱ्या तिसऱ्या संशयितास अटक

जळगाव प्रतिनिधी ।  जामनेर जाण्यासाठी निघालेल्या रिक्षा चालकाला कारमध्ये बसवून अज्ञात चार जणांनी रेमंड चौकात बेदम मारहाण करून खिश्यातील पैसे कढून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तिसऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर चौथा संशयित अद्याप फरार झाला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर २०२० रोजी शहरातील रेमंड चौकात दुपारी घडली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल आहे. आता संशयित आरोपींची संख्या तीन झाली आहे.

दीपक रतिलाल माळी (वय-२८, रा. पाळधी ता. धरणगाव) हे जळगाव ते पाळधी दरम्यान रिक्षा चालवतात. ते बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जामनेरला जाण्यासाठी अजिंठा चौफुलीवर आले. रिक्षा लावल्यानंतर जामनेर जाण्यासाठी रोडवर उभे होते. त्यावेळी एक कार (एमएच-१८, डब्ल्यू- ४५८८) आली. त्यातील चालकाने जामनेर जाण्यासाठी विचारले, दीपक हे जामनेर जाण्यासाठी कारमध्ये बसले, पुढे रेमंड चौकात कार थांबवून कारच्या बाजूला बसलेले अज्ञात व्यक्तींनी दोन्ही हात पकडून खिशातील १२५० रुपये बळजबरीने हिसकावून जिवे मारण्याची धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगाची झाडाझडती घेतल्यानंतर कारच्या खाली उतरवून दिले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी गुन्ह्यातील संशयित आरोपी वसीम खान अजमल खान (वय-३०) आणि सलीम खान उर्फ गुड्डू इब्राहिम खान (वय-३३) दोन्ही रा. रा. दुध डेअरीजवळ नशिराबाद यांना यापुर्वी अटक करण्यात आली होती. तिसरा संशयित आरोपी नदीम खान हुसेन खान (वय-३०) रा. शिवाजी नगर, उमर कॉलनी याला एमआयडीसी पोलीसांनी आज पहाटे राहत्या घरातून अटक केली. आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. चौथा संशयित आरोपी वसीम रजोद्दीन रा. ताज नगर नशिराबाद हा अद्याप फरार आहे. ही कारवाई उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, आनंद सिंग पाटील, अतुल वंजारी,  इमरान सय्यद, सुधीर साळवे यांनी केली.

Protected Content