पक्षावर उठ-सूट केलेली टीका खपवून घेतली जाणार नाही – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

सोलापूर, वृत्तसंस्था | ‘पक्षाच्या निर्णयाबाबत कुणाचा काही आक्षेप असेल तर पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करा. पक्षशिस्तीचा भंग करू नका. केंद्रापासून गल्लीपर्यंत वातावरण कडक आहे. रोज उठून पक्षविरोधी बोलले तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा परळीतील मेळाव्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

 

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काल परळी इथे पंकजा मुंडे समर्थकांचा मेळावा झाला. या मेळाव्यास भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री प्रकाश मेहता व अन्य आजी-माजी आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना पंकजा व खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरांना इशारा दिला. केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण आहे. पक्षाविरोधातील कारवाया खपवून घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला याची झलक सर्वांनी पाहिलीच आहे,’ असेही ते म्हणाले.

पंकजांच्या बंडावरही केले भाष्य
पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, परळीच्या मेळाव्यात काहींनी बंडाची भाषा केली. बंड केल्याशिवाय न्याय मिळत नाही. शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बंड केल्यामुळंच त्यांना न्याय मिळाला, असंही म्हटलं गेलं. मात्र, बंड आपल्या लोकांविरुद्ध करायचे नसते. शिवाजी महाराजांनी मोघलांविरुद्ध बंड केले. सावरकरांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. मतभेद असायला पाहिजेत. पण ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. त्यातून मार्ग काढता येईल.’

…तर तीव्रता वाढली असती !
परळीच्या मेळाव्याला जाण्याच्या निर्णयाबद्दलही त्यांनी खुलासा केला. ‘मी मेळाव्याला जाऊ नये, असे अनेकांचे मत होते. तिथे अनुचित प्रकार होऊ शकतो, असेही सांगितले गेले. पण मी ठाम होतो. जे झाले ते चित्र वेदना देणारे होते, हे खरेच. पण मी गेलो नसतो तर एकूण प्रकरणाची तीव्रता वाढली असती,’ असे पाटील म्हणाले.

Protected Content