जळगाव प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षात ओबीसींची गळचेपी होत असून मुंडे भगिनींनाही अडचणी येत आहेत. यामुळे आपण त्यांना सर्वप्रथम शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. हीच आता वंजारी समाजबांधवांची भावना असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
तालुक्यातील किनोद येथे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात ओबीसींची गळचेपी होत आहे. भाजपने एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना तिकिटेही दिली नाहीत. यातच विधानसभा निवडणूकीनंतर पंकजा मुंडे यांना हवे तसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडत्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना संघर्ष करावा लागत आहे. यामुळे आपणच त्यांनी शिवसेनेत यावे ही पहिल्यांदा ऑफर दिली होती. आता हीच भावना वंजारी समाजबांधवांनी व्यक्त केली असल्याचे ना. पाटील म्हणाले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचे स्वागतच आहे. त्यांना पक्षात योग्य ती सन्मान दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, याप्रसंगी त्यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, कोकणातील आपत्तीच्या काळात राजकारण करता कामा नये. पूर काही कुणाचे घर पाहून येत नाही. मात्र नारायण राणे यांची स्थिती डोकं फिरलया…अशी झाल्याची टीका ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
खालील व्हिडीओत पहा ना. गुलाबराव पाटील नेमके काय म्हणालेत ते ?