जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बेळी येथे आज दुपारी आलेल्या तुफानी वादळामुळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांची पत्रे उडून गेली आहेत.
बेळी गावाला आज दुपारी वादळी पावसाचा फटका बसला. यात विशेष करून जोरदार वादळामुळे गावासह शिवाराचे मोठे नुकसान झाले. गावातील बहुतांश घरांची पत्रे दूरवर उडून गेली असून यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे झाडे उन्मळून पडली असून यामुळे गावात शिरण्यासही अडचण येत आहे.
या वादळाचा शिवारालाही मोठा फटका बसला आहे. शेतांमधील पीक हे अक्षरश: आडवे झाले असून शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. या भयंकर वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकार्यांनी तेथे धाव घेतली असून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या वादळामुळे बेळी येथील ५० पेक्षा जास्त घरांची पत्रे उडून गेली असून या लोकांचा संसार अक्षरश: उघड्यावर आला आहे. तसेच यामुळे बहुतांश शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. यामुळे येथील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.