मुंबई – जे चित्रपट कलावंत अंमली पदार्थ सेवन करतात,अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटात काम देऊ नये अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिला आहे.
याबाबत रामदास आठवले म्हणाले की, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतर्फे अंमलीपदार्थ वापरल्याच्या संशयातून सध्या फक्त महिला कलाकारांची चौकशी केली जात असल्याचा संदेश जात आहे. लागोपाठ अभिनेत्रींचीच नावे पुढे आली आहेत. यात पुरुष कलाकारांची नावे जर असतील तर त्यांची त्वरित चौकशी करावी. स्त्री पुरुष भेदभाव नसावा मात्र यात केवळ अभिनेत्रींचीच नावे पुढे येत आहेत या प्रश्नांकडेही नार्कोटिक्स विभागाने लक्ष द्यावे असं आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे. दिशा सालियन यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत अभिनेत्री पायल घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सिने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना मुंबई पोलिसांनी अटक केली पाहिजे असंही रामदास आठवलेंनी सांगितले.