सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पडल्यानंतर पुढे काय ते बघू ! -चंद्रकांत पाटील

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ‘हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पडल्यानंतर पुढे काय ते बघू’ असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यामुळे नवीन राजकीय समीकरणाची  चर्चा सुरु झाली आहे. 

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेत शिवसेना नेते संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. दरम्यान, आज सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये दुपारी दुपारी १.३० ते ३.३० वाजता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. ग्रँड हयातमध्ये देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाली असा दावा भाजपाने केला आहे. परंतु या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकांशी बोलतांना म्हणाले की  भिन्न विचारांचे पक्ष, नेते एकमेकांना भेटत असतात, गेल्या ९ महिन्यापासून हे सरकार जाणार आहे अशी चर्चा होते, मात्र फडणवीस असो किंवा मी असेल आम्ही असं विधान केलं नाही, सरकार पाडण्यासाठी भाजपा भूमिका बजावणार नाही, पण हे सरकार अंतर्विरोधामुळे पडेल, पडल्यानंतर पुढे काय ते बघू असं त्यांनी सांगितले.

त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर फडणवीस आणि राऊत यांची बैठक झाल्याची पुष्टी दिली आहे. प्रविण दरेकरांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही असा दावा त्यांनी केला आहे. 

मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना प्रकरणावरुन भाजपाला निशाणा साधला होता, सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याबद्दल संजय राऊतांनी भाजपावर आरोप केले होते. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचेही नाव जोडण्यात येत होते, मात्र आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणाशी माझा संबंध नाही असं पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं होतं.

शिवसेनेने आपल्या मूळ विचारधारेच्या विरोधात असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली, त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे विराजमान झाले, मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाने प्रयत्न केला, त्यानंतर शिवसेनेने भाजपावरही निशाणा साधला. मात्र या भेटीनंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

दोन विरोधी पक्षांचे नेते कधी एका कार्यक्रमात एकत्र येणार असतील तर त्यांची भेट होते, अशाप्रकारे कोणतीही गुप्त बैठक होऊ शकत नाही, लपवाछपवी करण्याचं कारण नाही, संजय राऊत यांच्यासोबत बैठक झाली हे आम्हाला काहीही माहिती नाही, भाजपा-शिवसेना सध्या एकत्र येतील असं वाटत नाही, दोन्ही पक्ष राजकीय मार्गातून खूप दूर झाल्याचं दिसतंय, पण राजकारणात काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊ शकते, तर शिवसेना-भाजपा एकत्र येऊ शकतील, पण संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एका बैठकीत शिवसेना-भाजपा जवळ येईल असं वाटत नाही असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली.

Protected Content