धक्कादायक : रंगपंचमी नंतर पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा वाघुर धरणात बुडून मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रंगपंचमी खेळून झाल्यावर तालुक्यातील कंडारी रायपूर परिसरातील वाघूर धरणात पोहायला गेलेला रोहित कैलास पाटील (वय १८, रा. कुसुंबा ता. जळगाव) हा बुडाल्याची धक्कादायक घटना सोमवारी २५ रोजी दुपारी घडली होती. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजता मिळून आला आहे. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे रोहित पाटील हा तरूण आपल्या आई, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. एमआयडीसीतील एका चटई कारखान्यात तो कामाला होता. सोमवारी २५ मार्च रोजी धुलिवंदननिमित्त गावात तरुणांनी होळी खेळली. त्यातील काही तरुण हे दुपारी १२.३० वाजता पोहण्यासाठी कंडारी-रायपूर शिवारातील वाघूर धरणात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील रोहित पाटील याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा शोध घेतला.

अखेर मंगळवारी २६ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रोहितचा मृतदेह धरणात मिळून आला. त्याला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी कुसुंबा गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content